देशविदेश

विकसित भारत २०४७ साठी जपानसोबत आर्थिक व तांत्रिक सहकार्य महत्त्वाचे – राम शिंदे

 

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांच्यासोबत सदिच्छा भेट; भारत-जपान द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा

मुंबई, दि. : भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक सहकार्याला चालना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी जपानसारख्या प्रगत राष्ट्रांशी सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधानभवन येथे जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्यदूतावासाचे उप-वाणिज्यदूत निशिओ र्यो, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (आयएफएस) स्वप्नील थोरात, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव शिवदर्शन साठ्ये तसेच सभापतींचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.

भारत-जपान सहकार्य अधिक बळकट करण्यावर सभापती राम शिंदे यांचा भर

यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी जपानच्या विकासाचा आणि द्वितीय महायुद्धानंतरच्या उल्लेखनीय पुनर्निर्माणाचा विशेष उल्लेख करत जपानच्या प्रगतीचे कौतुक केले. पायाभूत सुविधा, उद्योग आणि विविध विकास प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय उद्दिष्टाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत अग्रणी भूमिका बजावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख धोरणांना गती देण्यात येत असून गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींचा उल्लेख करताना प्रा. शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात जपानी कंपन्यांनी ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याची माहिती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान लक्षणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत भारत-जपान संबंध अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात दोन्ही देशांमधील मैत्री, व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रासह भारताच्या प्रगतीसाठी जपानचा सकारात्मक सहभाग – साटो हितोमी

जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी भारत-जपान संबंध अधिक बळकट करण्यासाठी व्यापार, गुंतवणूक, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.

भारतात कार्य करण्याचा दीर्घ अनुभव लाभल्याचा उल्लेख करत त्यांनी मुंबईत काम करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याचे नमूद केले. गेल्या काही वर्षांत भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक झाले असून विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण आणि लोकांमधील संवादाला अधिक चालना देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर राहील आणि भविष्यात दोन्ही देशांतील मैत्री व आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांचा शाल, पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह आणि ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथ देऊन सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!