डेटा एन्ट्रीच्या आमिषाने परदेशात नेलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी हालचाली वेगात

म्यानमार-थायलंड सीमेवर अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे बचावकार्य सुरू : खा. अशोक चव्हाण
मुंबई, दि. २ जुलै २०२६ : म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासांच्या समन्वयाने बचावकार्य सुरू केले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा आदी जिल्ह्यांसह देशातील विविध भागांतील तरुणांना डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवून थायलंडमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना बेकायदेशीरपणे म्यानमार सीमेवरील ठिकाणी डांबून ठेवून जबरदस्तीने सायबर फसवणुकीच्या कामात सहभागी करून घेतल्याचा प्रकार अलीकडे समोर आला होता.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत खासदार अशोक चव्हाण यांनी २९ जून २०२६ रोजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याची मागणी केली होती.
या पत्रानंतर बँकॉक येथील भारतीय दूतावासाने १ जुलै २०२६ रोजी खासदार चव्हाण यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधून बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली.
बँकॉक येथील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित सायबर फसवणूक केंद्रे म्यानमारमध्ये, थायलंड-म्यानमार सीमेलगत कार्यरत आहेत. तेथून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना शक्य तितक्या लवकर मायदेशी परत आणण्यासाठी बँकॉक येथील भारतीय दूतावास, यांगून येथील भारतीय दूतावास तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या प्रकरणी केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात असून, महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.




