मुंबई

विकास कोणासाठी? पश्चिम उपनगरातील ८० लाख नागरिकांचा प्रश्न

धनदांडग्यांसाठी हजारो कोटी… सर्वसामान्य नागरिकांचे काय?

वांद्रे–वरळी सागरी सेतूवरून वांद्रे किल्ला–बॅण्डस्टँड इंटरचेंजसाठी तब्बल ₹१,७२२ कोटींची तरतूद केली जात आहे. पण वांद्रे ते दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमके काय केले जात आहे?

सागरी सेतूमुळे प्रवासाचा वेळ निश्चितच कमी झाला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र वांद्रे पश्चिमेकडून मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसरकडे जाणाऱ्या नागरिकांना आजही रिक्षा, बेस्ट बस, खासगी वाहन किंवा रुग्णवाहिका अशा कोणत्याही वाहनाने दोन ते अडीच तासांचा प्रवास करावा लागतो. हा प्रश्न अजूनही कायम आहे.

मेट्रो सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सुरुवातीला गुंदवली ते अंधेरी पश्चिम (दहिसर पूर्व मार्गे) अशी सेवा होती. आता गुंदवली ते काशीगाव आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम अशा दोन स्वतंत्र मार्गिका झाल्या आहेत. पुढे गुंदवली ते मुंबई विमानतळ (टी-२) पर्यंतही सेवा सुरू होणार आहे.

परंतु काशीगावपर्यंत सेवा सुरू झाल्यानंतर दहिसर पूर्व येथे प्रवाशांना मेट्रो बदलावी लागते. केवळ दोन स्थानकांच्या प्रवासासाठीही ही गैरसोय सहन करावी लागते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उद्यान ते आनंदनगर या प्रवासात केवळ बदलामुळे सुमारे २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ खर्ची पडतो.

या संदर्भात मी एमएमआरडीएकडे मागणी केली होती. मात्र “मार्गिका वेगळ्या आहेत” हे कारण देत ती फेटाळण्यात आली. अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

हार्बर रेल्वेवर पनवेल–गोरेगाव आणि सीएसएमटी–गोरेगाव अशा थेट सेवा चालतात. मग गुंदवली ते अंधेरी पश्चिम (दहिसर पूर्व मार्गे) अशी थेट मेट्रो सेवा का चालवता येऊ नये? त्याचबरोबर दुसरी सेवा गुंदवली ते काशीगाव अशी ठेवता येईल. त्यामुळे दहिसर पूर्व येथे मेट्रो बदलण्याची गरज राहणार नाही आणि लाखो प्रवाशांचा वेळ वाचेल.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांचे प्रतिनिधित्व करणारे ३ खासदार, १६ आमदार आणि १०० हून अधिक लोकप्रतिनिधी आहेत. पश्चिम उपनगरातील सुमारे ८० लाख नागरिकांच्या दैनंदिन, सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी ते ठोस पावले उचलणार का?

हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जात आहेत, ही चांगली बाब आहे. पण त्या विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही समानपणे मिळाला पाहिजे. विकास केवळ काहींच्या सोयीसाठी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या सुलभ आणि सन्मानजनक प्रवासासाठी असला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!