मॅनहोल्सवर आलेखन करून संरक्षक जाळ्या बसवा; अंकित प्रभू यांचे पत्र

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध करा; मुंबईतील मॅनहोल्सवर आलेखन करून संरक्षक जाळ्या बसवा : नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे मागणी
मुंबई, दि. … (प्रतिनिधी) : मुंबईतील सिमेंट काँक्रीट (CC) रस्त्यांवरील सर्व मॅनहोल्सचे आलेखन (Mapping) करून त्यावर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक मॅनहोलची माहिती तत्काळ उपलब्ध होईल, अशी डिजिटल माहिती प्रणाली (डेटाबेस) विकसित करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक ५४ चे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल्स आहेत. मात्र, यापैकी अनेक मॅनहोल्सवर अद्यापही संरक्षक जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे.

२ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत त्यांनी या घटनेची जबाबदारी प्रशासनावर निश्चित होत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता तातडीने आणि ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरील अनेक मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. तसेच संबंधित मॅनहोल्सचे अचूक आलेखन किंवा डिजिटल माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने देखभाल आणि आपत्कालीन प्रतिसादामध्ये गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे प्रभू यांनी निदर्शनास आणून दिले.
पावसाळ्यापूर्वी तसेच नियमित साफसफाईच्या वेळी मॅनहोल्सची झाकणे उघडली जातात. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अनेकदा ती पूर्ववत बसविली जात नाहीत किंवा ती चोरीला जातात. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी त्या गायब झालेल्या आहेत. त्यामुळे उघड्या मॅनहोल्समध्ये पडून निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मॅनहोल्स सुरक्षित करणे, त्यांचे डिजिटल आलेखन करणे, संरक्षक जाळ्या बसविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक मॅनहोलचा माहितीसंच तत्काळ उपलब्ध होईल, अशी व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने ३१ मेपूर्वी सर्व उघड्या गटारांवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, जुलै महिना सुरू होऊनही अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तसेच, ३१ मेची मुदत उलटूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन सर्व मॅनहोल्सचे आलेखन, संरक्षक जाळ्यांची उभारणी आणि आधुनिक डिजिटल माहिती प्रणालीची अंमलबजावणी करावी, अशी सूचना नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.





