जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार; ५१% मतांचे ध्येय: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई: राज्यातील आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवणार असून, ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे महायुतीने ध्येय ठेवले आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुतीची बांधणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांवर काही मतभेद किंवा अडचणी येऊ शकतात. मात्र, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने लक्ष घालून अंतिम निर्णय घेतील.”
मुंबई महानगरपालिकेसाठी ‘४+४’ समन्वय समिती
मुंबई महानगरपालिकेसाठी देखील महायुती पूर्णपणे सज्ज झाली आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल. यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी, तसेच महायुतीचे प्रतिनिधी यांची एक समन्वय समिती एकत्र बसून चर्चा करेल. जिथे मतभेद होतील, तिथे वरिष्ठ नेते तोडगा काढतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, मुंबईच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील.
अजित पवार महायुतीचा अविभाज्य भाग
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून, ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये झालेले मतभेद आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमच्यात ‘मनभेद’ नव्हते, केवळ निवडणूकनिहाय ‘मतभेद’ होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ विकासासाठी कटिबद्ध
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आणि विकासावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर विदर्भाचा झपाट्याने विकास झाला आहे. छोटे राज्य विकसित होऊ शकतात, यावर भाजपचा विश्वास असून, विदर्भाला पूर्ण न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचे या भागात पतन झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, विदर्भात सर्वाधिक जंगल असल्याने वन विभागाचे मुख्यालय (फॉरेस्ट कार्यालय) मुंबईत हलवले जाणार नाही, असे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी यावेळी दिले.






