पूर आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधा; नागरिकांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. ६ : राज्यात मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत हेल्पलाईन क्रमांकांवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असून, ९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवरही नागरिक संपर्क साधू शकतात. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर तातडीने मदतकार्य आणि समन्वयासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत असून त्यांचा मुख्य हेल्पलाईन क्रमांक १०७७ आहे.
दरडप्रवण आणि संवेदनशील भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता नागरिकांनी त्वरित अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.





