आंतरजिल्हा प्रसूतीसाठी रुगवाहिका सेवेसंदर्भात स्वतंत्र धोरणाची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे

प्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना रुगवाहिका सुविधा उपलब्ध करावी; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी, आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई, दि. ३ : वर्धा जिल्ह्यातील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या तातडीने कार्यान्वयनासंदर्भातील लक्षवेधी क्र. ६ वरील चर्चेदरम्यान शिवसेना नेत्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षित वाहतुकीचा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. अशा महिलांसाठी रुगवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
विधानपरिषद सदस्य संजय भेंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होताना डॉ. गोऱ्हे यांनी पालघर जिल्ह्यातील कासा येथील एका महिलेचे उदाहरण सभागृहासमोर मांडले. प्रसूतीसाठी संबंधित महिलेला पालघरहून ठाणे येथे रुगवाहिकेद्वारे आणण्यात आले; मात्र प्रसूतीनंतर तिला परतीच्या प्रवासासाठी रुगवाहिका उपलब्ध करून न देता एसटी बसने पालघरला जावे लागले. ही घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भविष्यात अशा घटना होणार नाहीत, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता शासनाने स्पष्ट आणि प्रभावी धोरण आखणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. प्रसूतीसाठी एखाद्या महिलेला दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याची आवश्यकता भासल्यास तिला रुग्णालयात नेण्यासाठी तसेच प्रसूतीनंतर सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठीही रुगवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय बदल तातडीने करण्यात येतील तसेच प्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना रुगवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.






