मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

गरिबी रेषा व स्वामीनाथन अहवालाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान खोटे व हास्यास्पद : हर्षवर्धन सपकाळ
“खोटे बोलण्याबद्दल फडणवीसांना नोबेल द्यावे” – काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल
मुंबई, दि. १२ जून २०२६ : गरिबी रेषा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने पूर्णतः चुकीची व दिशाभूल करणारी असून, त्यांना खोटे बोलण्याबद्दल ‘नोबेल पुरस्कार’ द्यावा, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विविध वक्तव्यांवर जोरदार टीका केली. देशात गरिबी निर्मूलन झाल्याचा दावा करत असतानाच ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य रेशनवर दिले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “गरिबी संपली असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य वितरण कोणासाठी केले जाते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, हा आयोग काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात स्थापन करण्यात आला होता आणि त्याचा अहवालही त्याच काळात प्राप्त झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी नंतर सत्तांतर झाल्याने रखडली गेली. तरीही केंद्रातील भाजप सरकारने ती अंमलात आणल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना सपकाळ यांनी सांगितले की, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कांदा यांसारख्या प्रमुख पिकांना अद्यापही योग्य हमीभाव मिळत नाही. खरीप हंगामासाठी बी-बियाणे आणि खतांची टंचाई असून खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना सरकार मात्र निष्क्रिय आहे,” असे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या कामकाजावर टीका करताना सपकाळ यांनी सरकारला “आंधळे, बहिरे आणि मुके” असे संबोधले. तसेच, “पूर्वी राजे वेशांतर करून जनतेची स्थिती जाणून घेत असत, पण आजचे नेतृत्व केवळ राजकीय पक्ष फोडण्यात व्यस्त आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस हा देशाचा आधार असून भाजपलाच काँग्रेस पक्ष एकमेव राजकीय आव्हान देऊ शकतो. “२०१४ मध्ये काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्यांच्या आजूबाजूला काँग्रेसचेच लोक दिसत आहेत,” असा दावाही त्यांनी केला. भाजप हा मित्रपक्षांना गिळणारा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली.






