पावसाळी आपत्ती हाताळण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मुंबईतील मृत्यूंसाठी सरकार जबाबदार; मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई, दि. ६ जुलै : राज्यातील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि पावसाळी आपत्ती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली. मुंबई परिसरातील अलीकडील घटनांमध्ये झालेल्या १२ जणांच्या मृत्यूसाठी सरकारला जबाबदार धरत मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती तयारी करण्यात सरकार आणि प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे झालेली जीवित व वित्तहानी ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून सरकारच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर सुमारे ७,१८१ कोटी रुपये खर्च करूनही अवघ्या दोन महिन्यांत वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात तज्ज्ञांनी नोंदवलेल्या १३ गंभीर तांत्रिक आक्षेपांकडे दुर्लक्ष करून घाईघाईत काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. उद्घाटनांचा दिखावा आणि श्रेयवादासाठी जनतेच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा ‘टेस्टिंग पिरियड’ सुरू असल्याचे केलेल्या वक्तव्यावर टीका करत सपकाळ म्हणाले की, २०१४ पासून भाजपाचे सरकार असूनही अजूनही ‘टेस्टिंग’ सुरू असल्याचे सांगणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. प्रकल्पातील त्रुटी आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी अशा प्रकारची कारणे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरही सपकाळ यांनी टीका केली. देशातील प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी ते सतत परदेश दौऱ्यांवर असल्याचा आरोप करत, त्यांनी भारतातही अधिक वेळ द्यावा, अशी टीका त्यांनी केली.






