मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत तिसऱ्यांदा दिंड्यांना अनुदान

आषाढी वारीसाठी मानाच्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान : शासनाचा निर्णय
सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
पुणे, दि. २ जुलै : आषाढी एकादशीच्या वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक समता आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होतात. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

यावर्षी आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसोबत जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून, यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, “राज्य शासन वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन, संवर्धन आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत हे अनुदान देण्यात येत आहे.”






