पावसाचा धोका वाढला; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४x७ ‘अलर्ट मोड’वर; नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये : मुख्यमंत्री
मुंबई, दि. ६ : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबईसह किनारी भागात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याऱ्या या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी २४x७ ‘अलर्ट मोड’वर राहून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच आज आणि उद्या अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांना सज्ज ठेवण्यात आले असून गरज भासल्यास तात्काळ घटनास्थळी रवाना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले. तसेच संभाव्य दरडीप्रवण भागांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले असून मुंबई-गोवा महामार्गावरील भूस्खलनाचा मलबा तातडीने हटवून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात विशेष दक्षतेचे निर्देश
अरबी समुद्रावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्हा, विशेषतः त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असून सुमारे ३०० मिलिमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील काही दिवस पर्यटकांनी त्र्यंबकेश्वर परिसरात जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढील ४८ तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी कमाल दक्षता बाळगावी, अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने कारवाई करावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले.
मुंबईत चार दिवसांत महिनाभराच्या सरासरीइतका पाऊस
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत अवघ्या चार दिवसांत एका महिन्याच्या सरासरीइतका पाऊस झाला आहे. काल शहरात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली. साधारणपणे संपूर्ण पावसाळ्यात जितकी झाडे पडतात, त्यापैकी सुमारे ३०० झाडे एका दिवसात कोसळल्याची नोंद झाली आहे.
येत्या ८ जुलैच्या रात्रीपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भूस्खलनाचा मलबा युद्धपातळीवर हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचे आवाहन
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. खाजगी आस्थापनांनीही मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा द्यावी. योग्य कारण नसताना ही सुविधा नाकारणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
पावसाची नोंद
६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई उपनगरात १५१.२ मिमी, मुंबई शहरात १०५ मिमी, रायगडमध्ये २३६.६ मिमी, ठाण्यात १५८.७ मिमी आणि रत्नागिरीमध्ये १५२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.





