महाराष्ट्रमुंबई

मुंबईची ओळख पुसण्याचा डाव? ‘आय आय टी-बॉम्बे’ वादावरून राज ठाकरेंचा मोठा आरोप!

मुंबई:मराठी अस्मिता आणि मुंबईच्या मुद्द्यावर नेहमीच रोख ठोक भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी  भाजपा मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी अलीकडेच मुंबईत आयआयटीच्या एका कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय… असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजप वर  X माध्यमावरून एक पोस्ट प्रसारित करून जोरदार टीका केली आहे.

अनेक दशकांपासून मराठी नेत्यांनी आणि जनतेने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जो डाव उधळला आहे, त्याबद्दलची ‘मळमळ’ आता बाहेर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्ट मध्ये ते ते म्हणतात की, ‘मुंबई’ हे नाव आपल्या मुंबा आईच्या (मुंबईची मूळ देवी) नावावरून आले आहे. त्यामुळे हे नामकरण केंद्रातील काही लोकांना खटकत आहे. हे लोक मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा कट रचत आहेत.

ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि  आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.

या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!