राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा सत्याग्रह; न्यायालयीन चौकशीची सपकाळांची मागणी

राम मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई/नाशिक, दि. ७ जुलै : अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सध्या सुरू असलेली विशेष तपास पथक (SIT) चौकशी निष्पक्ष होणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

प्रभू रामाच्या नावावर जमा झालेल्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ सुरू केला असून त्याची सुरुवात सोमवारी नाशिक येथील काळाराम मंदिरातून करण्यात आली. या आंदोलनात खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शरद अहिर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश ऊर्फ बब्लू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर, प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सत्याग्रहाची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाने झाली, तर सांगता ‘पसायदान’ने करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी आरोप केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थापन करण्यात आलेल्या राम मंदिर ट्रस्टमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, या ट्रस्टला माहितीच्या अधिकाराच्या (RTI) कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या अब्जावधी रुपयांच्या देणग्या, तसेच सोने-चांदी आणि दागिन्यांच्या कथित गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सपकाळ यांनी पुढे दावा केला की, राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराची माहिती सर्व संबंधितांना असूनही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन बाळगले आहे. सध्या सुरू असलेली SIT चौकशी ही केवळ धुळफेक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, इतर प्रकरणांमध्ये तातडीने कठोर कारवाई केली जाते, मग या प्रकरणात त्यांच्याविरोधात अशीच कारवाई कधी होणार?

काँग्रेसच्या सत्याग्रहावर बोलताना सपकाळ यांनी आरोप केला की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याचा इशारा देऊन आंदोलनाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सत्याग्रह यशस्वीपणे पार पडला असून ९ जुलैपासून राज्यभर हे आंदोलन राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रामभक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेसवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसच्या मनात आणि संविधानातील मूल्यांमध्ये प्रभू राम आहेत. त्यामुळे रामभक्तीबाबत काँग्रेसला कोणी शिकवण्याची गरज नाही. प्रभू रामाच्या नावावर झालेल्या कथित गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत काँग्रेसचा सत्याग्रह सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!