कोंकण

नितेश राणे यांनी धाड टाकलेल्या कणकवलीतील मटका व्यवसायाला संरक्षण कोणाचे? पोलिसच संशयाच्या घेयात!

सिंधुदुर्ग: पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे, विशेषतः कणकवली येथील मटका अड्डयावर स्वतः छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या राणे यांनी थेट कारवाई करत अवैध धंद्यांच्या साखळीचा पर्दाफाश केला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांना संरक्षण कोणाचे, असा सवाल आता विचारला जात आहे.
गुरुवारी संध्याकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानक कणकवली बाजारपेठेतील महादेव रमाकांत घेवारी यांच्या मटका अड्डयावर छापा टाकला. पोलिसांनी वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई न केल्याने राणे यांनी स्वतः यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. या छाप्यात त्यांनी १२ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रु. २ लाख ७८ हजार ७२५ रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
छाप्यादरम्यान राणे यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना जाब विचारला आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्हाला मटका अड्डयावर धाड टाकावी लागते, तर पोलीस यंत्रणा काय करते?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका हा काही आता सुरू झालेला व्यवसाय नाही. तो वर्षानुवर्षे सुरू आहे आणि त्याला खाकी वर्दीचे संरक्षण असल्याचा आरोप केला जातो. बीट हवालदार ते थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाकीट पोहोचत असल्यामुळे हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतात. मटका, तीन पत्ती जुगार, गोवा बनावट दारू, अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय बिनबोभाट चालतात. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचं चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!