‘भूमिकन्या सीता’ नावाने महिला शेतकरी योजना राबविण्याची सूचना

महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनेला ‘भूमिकन्या सीता’ हे नाव द्यावे; शशिकांत पागे यांची सूचना
महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ मंजूर केले आहे. कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना कायदेशीर ओळख देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत पात्र महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्यात येणार असून, जमीन त्यांच्या नावावर नसली तरी विविध कृषी योजना, अनुदान, कर्ज, बियाणे, खते आणि पीक विमा यांसारख्या सुविधांचा थेट लाभ त्यांना मिळू शकणार आहे.
या विधेयकात पशुपालन, दुग्धव्यवसाय, फुलशेती आणि इतर कृषीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. तसेच महिला शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील सर्व महिला शेतकऱ्यांची नोंदणी करून स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.

महिला शेतकऱ्यांचे अन्नसुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. भारतात शेती क्षेत्रातील कामगारांपैकी सुमारे ४७ टक्के आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी सुमारे ३३ टक्के महिला असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे तब्बल अठरा वर्षे सभापती राहिलेले आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते व शिल्पकार आदरणीय वि. स. (विठ्ठल सखाराम) पागे यांच्या पुतण्यांपैकी ज्येष्ठ अभ्यासू नेते शशिकांत गोपाळ पागे यांनी या विधेयकाचे स्वागत करत महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. सलग दोन दिवस झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी शासनाचे अभिनंदन करत या योजनेला ‘भूमिकन्या सीता’ हे नाव देऊन त्याच नावाने राज्यभर राबविण्याची मागणी केली.
शशिकांत पागे यांनी या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतीत राबणाऱ्या महिलांना प्राधान्याने मिळावा, असे मत व्यक्त केले आहे. ऊसतोड मजूर, शेतमजूर, रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिला तसेच विविध कृषी आणि श्रमिक क्षेत्रांत प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या महिलांचा या योजनेत समावेश व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे.
तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम, आयकर भरणाऱ्या मध्यम व उच्च उत्पन्न गटातील महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, तर प्रत्यक्ष श्रम करून उपजीविका करणाऱ्या गरजू महिलांनाच प्राधान्य दिले जावे, अशी त्यांची सूचना आहे.
शशिकांत गोपाळ पागे यांची ही सूचना महत्त्वपूर्ण आणि विचार करण्यासारखी असल्याचे मत व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने या सूचनेचा सकारात्मक विचार करून या योजनेला ‘भूमिकन्या सीता’ हे नाव दिल्यास, रोजगार हमी योजनेचे शिल्पकार वि. स. पागे यांच्या कार्याचा गौरव होईल आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही योग्य सन्मान राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वि. स. पागे हे अभ्यासू, दूरदृष्टीचे आणि लोककल्याणकारी धोरणांचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांनीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचे चिरंजीव प्रकाश विठ्ठल पागे तसेच पुतणे शशिकांत गोपाळ पागे यांनी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिका बजावली आहे. वि. स. पागे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र विठ्ठलराव पागे हे संगीत आणि लोककला क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व होते. एप्रिल २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचाही या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा लागेल.






