संविधानाची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्षाची वेळ: हर्षवर्धन सपकाळ….
'गुलामगिरीचे बंधन तोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची हाक दिली' – काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे चैत्यभूमीवर अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे; परंतु याच संवैधानिक मूल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष करणे अनिवार्य असून, संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी आपण चैत्यभूमीवर नतमस्तक झालो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
संवैधानिक संघर्ष आणि बाबासाहेबांचे कार्य
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, गुलामगिरी आणि शोषण हा जगभरातील समाजव्यवस्थेला लागलेला कलंक होता. या गुलामगिरीचे बंधन तोडून ज्या महामानवांनी सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली, त्यातील मोठे नाव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, पीडित व शोषितांचा मोठा लढा लढला, समाजात समतेची बिजे रोवली आणि हाच भाव त्यांनी भारताच्या संविधानातून साकार केला आहे.
खासगीकरणावर आणि नामांतरावर टीका
मेट्रो स्टेशन नामांतरावर: मेट्रो स्टेशनला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी रास्त असली तरी, भाजप सरकार ते मान्य करेल असे वाटत नाही. जे उद्योगपती सरकारला इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून पैसे देतात, त्यांचीच नावे मेट्रो स्टेशनला (उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, सीएसएमटी स्टेशन) दिली जातात, हे आपण पाहिले आहे. भाजप सरकार आपलेच घोडे दामटवत आहे. नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असताना त्याला एनएम (नरेंद्र मोदी) विमानतळ म्हटले जात आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
इंदू मिल स्मारकातील विलंब
सरकारला ज्या कामातून मोठा ‘मलिदा’ मिळतो, तीच कामे भाजप सरकार प्राधान्याने करते. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हे त्यातीलच आहेत. समृद्धी महामार्गातून आमदार फोडून ‘५० खोके एकदम ओके’ चा कार्यक्रम पार पडला. आता मध्य भारतातील खाणीतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा यासाठी एका उद्योगपतीसाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. याउलट, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. भाजपने आजपर्यंत दिलेली कोणती आश्वासने पूर्ण केली, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्मारकाच्या आश्वासनावर विश्वास ठेवावा, असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला.
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळावर टीका
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळावर बोलताना सपकाळ म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने खासगी कंपन्यांना रान मोकळे करून दिले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण या कंपन्यांवर राहिलेले नाही. प्रवाशांची लूट सुरू आहे. इंडिगोचा गोंधळ आणि प्रवाशांना झालेला प्रचंड त्रास हे भाजप सरकारचा नाकर्तेपणा व अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे.
‘चिकित्सा व औषध वाटप केंद्राला भेट’
अभिवादन केल्यानंतर सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजी पार्क येथे उभारलेल्या वैद्यकीय चिकित्सा व औषध वाटप केंद्राला भेट देऊन तेथील कार्यरत डॉक्टर्स आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राजन भोसले, सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर, श्रीरंग बर्गे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, दिनेश वाघमारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





