भाजपा-आरएसएसविरोधात काँग्रेसचे एल्गार; उद्यापासून राज्यभर आंदोलन

प्रभू रामाच्या नावावर देणग्यांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप; काँग्रेसचे राज्यभर आंदोलन जाहीर

मुंबई, दि. ६ जुलै २०२६ : अयोध्येतील प्रभू राम मंदिरासाठी भक्तांनी दिलेल्या देणग्यांवर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, रामभक्तांनी मंदिरासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि दागिन्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करत पक्षाने याला “श्रद्धेवरचा दरोडा” असे संबोधले आहे. या प्रकरणी जबाबदार असलेल्या घटकांवर कठोर कारवाईची मागणीही काँग्रेसने केली आहे.

या आंदोलनाची सुरुवात उद्या, मंगळवार दि. ७ जुलै रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरातून होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता या आंदोलनाचा प्रारंभ केला जाणार आहे.

या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, नाशिक शहर अध्यक्ष निलेश ऊर्फ बब्लू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर ९ जुलै ते १४ जुलै दरम्यान राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह राबविण्यात येणार असून, जिल्हास्तरावर राम मंदिर, शिव मंदिर किंवा हनुमान मंदिरांमध्ये हे सत्याग्रह आयोजित केले जाणार आहेत. या माध्यमातून प्रभू रामाच्या नावाचा वापर करून कथित गैरव्यवहार करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!