दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी-पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग
१ लाख महिलांचे आंदोलन निष्फळ...
चंद्रपूर,दि.२८:राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या आरोग्यावर काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी हा चंद्रपूरसाठी काळा दिवस असल्याचे मत व्यक्त केले आहे.
तसेच हे दारुबंदीचं अपयश आहे की मंत्री-शासनाचं? असा प्रश्नही उपस्थित केलाय. दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अभय बंग म्हणाले, “जिल्ह्यातील 1 लाख महिलांचे आंदोलन, 585 ग्रामपंचायती व जिल्हापरिषदांचा ठराव यामुळे शासनाने 6 वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्या दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हे अगदी खरं आहे. पण सरकारच्या कोणत्या योजनेची आणि कायद्याची अंमलबजावणी 100 टक्के होते? मग या सर्व योजना-कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. म्हणून कोरोना नियंत्रणाचं कामही थांबवणार का?”
पद्मश्री बंग दाम्पत्याने राज्य सरकारला केलेले सवाल…
जिल्ह्यातील 4 लाख पुरुष दारू पितील, 1500 कोटी रुपये त्यावर उडवतील. त्यांच्या कुटुंबांचे काय होणार?
जवळपास 80,000 व्यसनी निर्माण होतील. त्याला जबाबदार कोण? त्यांची व्यवस्था काय?
स्त्रियांवर अत्याचार, गुन्हे, बलात्कार, मारपीट हे प्रचंड प्रमाणात वाढतील. त्यासाठी जबाबदार कोण ?
दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात चंद्रपूरमधील दारू आयात होईल. ती कोण व कशी थांबवणार ?
“चंद्रपूरच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस आहे” असे
डॉ. राणी बंग म्हणाल्या, “पालकमंत्री आपल्या भावी पिढीच्या रक्षणासाठी असतात. मात्र, चंद्रपूरचे पालकमंत्री निवडून आल्यापासून दारुबंदी उठवण्याच्या कार्यक्रमाचा घोषा लावत होते. जणुकाही दारुबंदी उठवण्याच्या एकमेव कामासाठी ते निवडून आले होते. अर्थात त्यांनी त्यांचा शब्द खरा करुन दाखवला आहे. मात्र, मंत्रिमंडळाने हीच तत्परता कोरोनाचं नियंत्रणासाठी खर्ची घातली असती तर अधिक चांगलं झालं असतं.”
दारुबंदीसाठी अनवाणी पायांनी 100 किलोमीटर चालणाऱ्या महिलांचा आवाज दबला
“चंद्रपूरची दारुबंदी अपयशी नाही, तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी झालंय. 70-100 किलोमीटर दूरहून महिला अनवाणी पायांनी नागपूरपर्यंत आल्या. त्या काही उगाच आल्या नाही. त्या महिलांचा आवाज पूर्णपणे दबला गेलाय. त्यामुळे या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करणं चंद्रपूरकरांची जबाबदारी आहे. मी चंद्रपूरच्या सर्व महिलांना आवाहन करते की आपण जननी आहोत. आपण नवीन जीवाला जन्म देतो. आपल्यासमोर आपली मुलं दारु पिऊन उद्ध्वस्त होतील हे कुठल्याही आईला बघावं वाटणार नाही. म्हणूनच महिलांनी चंद्रपूरमध्ये दारुबंदीची ही क्रांती घडवून आणली होती. पण त्यावर आज पाणी फेरलंय. म्हणूनच महिलांनी पुन्हा खंबीरपणे समोर यायला हवं,” असं राणी बंग यांनी नमूद केलं.