महाराष्ट्रवाहतूक

पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ; प्रवास, तीर्थाटन आणि विकासाला नवे पंख!

मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

मुंबई, दि. १७ :- पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानातून ऑनलाईन उपस्थित राहून तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानकावर केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे यांचीही उपस्थिती होती.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे रेल्वे परिसराची क्षमता वाढवण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणी आणि अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंगमुळे पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल. यामुळे सुमारे 20 अतिरिक्त गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

मुंबई–पुणे तिसरी व चौथी रेल्वे लाईन, तसेच भविष्यातील मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देतील, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील रेल्वे विकासासाठी सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 129 स्थानकांच्या पुनर्विकासापैकी 93 कामे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यात सध्या 24 वंदे भारत सेवा सुरू असून भविष्यात वंदे भारत स्लीपर गाड्यांचाही विस्तार होणार आहे.

पुणे हे शैक्षणिक, आयटी आणि औद्योगिक केंद्र असल्याने तसेच शिर्डी हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने या नव्या रेल्वेसेवेमुळे दोन्ही शहरांतील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे. भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसाठी सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या मार्गावर दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार तसेच संशोधकांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळणार असून बेलापूरमुळे शनि शिंगणापूर परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!