हिंदू हृदयसम्राटांना मानवंदना; स्वाभिमान, हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा ६० वर्षांचा विजयपथ
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा जपत शिवसैनिकांची वर्धापन दिनी नव्या बांधिलकीची प्रतिज्ञा

रणवीर राजपूत
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ६० वा वर्धापन दिन राज्यभर उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा संगम असलेल्या शिवसेनेच्या या गौरवशाली प्रवासाची आठवण काढत शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जाते. स्पष्टवक्तेपणा, परखड भूमिका आणि हिंदुत्ववादी विचार यामुळे त्यांनी लाखो शिवसैनिकांना प्रेरणा दिली. आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात कायम असल्याचे मानले जाते.
१९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर उभी राहिलेली शिवसेना पुढे हिंदुत्ववादी विचारधारेची प्रमुख राजकीय शक्ती बनली.”हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व” हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेपर्यंत पोहोचवला. मराठी माणसाचा स्वाभिमान आणि हिंदू समाजाचे संघटन यासाठी त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांतील कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
मराठी युवकांना रोजगार आणि शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी यासाठी लोकाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी प्रभावी लढा उभारला गेला.व्यंगचित्रकार, संपादक आणि प्रभावी वक्ते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची वेगळी ओळख होती. ‘मार्मिक’ आणि ‘सामना’ या माध्यमांतून त्यांनी मराठी समाजातील प्रश्न, राजकीय घडामोडी आणि हिंदुत्ववादी विचार प्रभावीपणे मांडले.
शिवसेनेच्या उभारणीत मीनाताई ठाकरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. शिवसैनिकांप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बाळासाहेबांना दिलेली खंबीर साथ यामुळे संघटनेला मोठे बळ मिळाले.बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी प्रामाणिक राहणे हीच त्यांना खरी मानवंदना असल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि समाजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला.
शिवसेनेचा ६० वर्षांचा प्रवास हा मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि लोकसेवेचा इतिहास मानला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा, धर्मवीर आनंद दिघे यांची लोकसेवेची परंपरा आणि आजच्या नेतृत्वाच्या माध्यमातून शिवसेना पुढील काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.






