उदय सामंत यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय चर्चांना उधाण; बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नवे तर्क-वितर्क
ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान सामंतांच्या सूचक स्टेटसकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या कथित बंडखोरीच्या चर्चांदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, या संदेशाचा संबंध सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडला जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील काही नेत्यांच्या संभाव्य भूमिकेबाबत चर्चा रंगत असतानाच उदय सामंत यांनी परभणीत माध्यमांशी संवाद साधताना, “संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल,” असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्या सोशल मीडिया आणि WhatsApp स्टेटसकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले.
सामंत यांच्या स्टेटसमागे नेमका कोणता संदेश दडलेला आहे, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली. काहींनी याकडे आगामी राजकीय घडामोडींचा संकेत म्हणून पाहिले, तर काहींच्या मते हा विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा असल्याची चर्चा रंगली.राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हालचाल महत्त्वाची मानली जात असताना, उदय सामंत यांच्या एका WhatsApp स्टेटसमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या प्रकरणावर चर्चा वाढल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. “एकनाथ शिंदे जिथे पुढाकार घेतात, ते यशस्वी होतच. मात्र ज्यांचा यावर विश्वास नाही, त्यांच्यासाठीच मी ते स्टेटस ठेवले होते,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वर्तुळात या स्टेटसबाबत चर्चा कायम आहे.





