मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना दिलासा; पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
शिक्षक समायोजनासाठी शिक्षण विभाग-महापालिकेला संयुक्त अहवालाचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबईबाहेर समायोजन न करता मुंबईतच समायोजन करावे आणि त्यांच्या पगारात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.
सन 2025-26 च्या संचमान्यतेनुसार मुंबईतील अनेक खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे महापालिका शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन करावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर यांनी पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती.
या संदर्भात आयोजित बैठकीत सध्या 1176 शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती समोर आली. शिक्षक संघटनांनी या शिक्षकांना पालघर, रायगड किंवा रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्ये पाठविण्याऐवजी मुंबईतच समायोजित करण्याची मागणी केली.शिक्षण विभागाकडून समायोजित शिक्षकांचा पगार मुंबई महापालिकेने द्यावा, असे शासनाचे धोरण असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मात्र, मुंबई महापालिकेने यापूर्वी अशा समायोजनाला तात्पुरते स्वरूप देण्याचा ठराव मंजूर केला असल्याने कायमस्वरूपी समायोजनासंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेच्या उपायुक्त प्राची जांभेकर यांनी कायमस्वरूपी समायोजन झाल्यास निवृत्ती वेतन, सेवाज्येष्ठता आणि शालार्थ आयडीसारख्या तांत्रिक बाबी निर्माण होऊ शकतात, असे नमूद केले.याबाबतच्या शासन निर्णयात स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कार्यपद्धती व निकष निश्चित करणारा सविस्तर अहवाल एका महिन्याच्या आत शासनाला सादर करण्यास सांगितले.
तोपर्यंत सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महापालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्यात यावे आणि त्यांच्या पगारात कोणताही अडथळा आणू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.




