मुंबई

हिम्मत असेल तर वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा…!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फडणवीस यांना आवाहन

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत असून अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे.फडणवीस हे तब्बल साडे सात वर्ष गृहमंत्री पदावर असून त्यांना या खात्याचा मोठा अनुभवही आहे.मात्र त्यांच्याकडेही काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा त्यांचा दावा असला तरी त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा,असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

पटोले म्हणाले की,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता,असे अनिल देशमुख यांनी जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतरच सांगितले होते.मग कालपर्यंत फडणवीस गप्प का बसले?, देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही. फडणवीस सरकार असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करत तर होतेच पण ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला यांनी पोलीस महासंचालक पदी बढती दिली.त्यामुळे फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धमकी देण्याऐवजी वस्तुस्थिती मांडावी, या आपल्या आवाहनाचा पटोले यांनी पुनरुच्चार केला.

……..आणि जनता मात्र वाऱ्यावर…

एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की,सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिलेली आहे.समित कदम हा सरकार व व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्ती असून त्यालाही वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे,ही जनतेच्या पैशाची लुट असून आपल्या बगलबच्च्यांसाठी पोलीस दल तैनात ठेवल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

..उरणची घटना अत्यंत गंभीर,कठोर कारवाई करा……

नवी मुंबईतील उरणमध्ये एका मुलीवर अत्याचार करून तीची निघृण हत्या करण्यात आली,ही घटना अत्यंत गंभीरच असून मुंबई व आसपासच्या भागातच महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागातील अवस्था काय असेल त्याचा विचार करा. याला कारण सत्तेत गुन्हेगारी प्रवृत्तीचेच लोक बसले असून गुन्हेगारांना कशाचीही भिती राहिलेली नाही.त्यामुळे उरण घटनेतील आरोपीला कठोरच शिक्षा झाली पाहिजे,अशीही मागणी पटोले यांनी केली.

असंवैधानिक सरकारच्या शेवटच्या घटका….

राज्यात दोन वर्षापूर्वी जे सत्तांतर झाले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते.हे सत्तातंर करताना देवेंद्र फडणवीस वेश बदलून भेटी घेत होते हे त्यांनीच सांगतिलेलेच असून आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तेच सांगितले.दहावेळा वेशांतर करुन दिल्लीत भेटी घेतल्या असे अजित पवार यांनी सांगितले आहे.तात्पर्य असे की सत्तेसाठी भाजप काहीही करु शकतो.त्यामुळे हे सरकार असंवैधानिकच असून सुप्रीम कोर्टानेही अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली व ३ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रकरणाची सुनावणी होऊ शकते.त्यामुळे या दोन्ही पक्षातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!