शासकीय अध्यादेश

नवी मुंबईच्या वाढत्या पाणीगरजेसाठी नवीन धरणाची तयारी

लवकरच नवी मुंबईकरांसाठी नवीन धरण उपलब्ध होणार; गणेश नाईक यांची ग्वाही

मुंबई, दि. ११ जून २०२६ (प्रतिनिधी) – नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, अनियमित पावसामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यात नवीन धरण उभारण्याचे काम सुरू असून लवकरच नवी मुंबईकरांसाठी नवीन धरण उपलब्ध करून दिले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही महाराष्ट्राचे वनमंत्री तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

सानपाडा नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांच्या कराराचा कालावधी कायमस्वरूपी अथवा किमान पाच वर्षांचा करण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी हा कालावधी पाच वर्षांवरून एक वर्षांवर आणण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी होती. दरवर्षी करार नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.


सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी विरंगुळा केंद्रांच्या करारासंदर्भातील अडचणी मंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी संबंधित नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना कराराचा कालावधी पुन्हा पाच वर्षांचा करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच विरंगुळा केंद्रांच्या कराराचा कालावधी पाच वर्षांचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आल्याबद्दल सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गणेश नाईक यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार ११ जून २०२६ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित जनता दरबार कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव व माजी अध्यक्ष राम काजरोलकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.

याच प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख अजय पवार यांनी सानपाडा परिसरातील पाणीटंचाई आणि पामबीच मार्गावरील ४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला रेल्वे कारशेडजवळ रेल्वे रुळाखालून जोडणी देण्यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले. त्यावर मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, मोरबे धरणातील पाणीसाठ्यावर पडणारा ताण, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन धरणामुळे भविष्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास समाजसेवक गणेश कमळे, संघाचे सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, सहसचिव राजेंद्र कदम, माजी खजिनदार विष्णुदास मुखेकर, उपाध्यक्ष बळवंतराव पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल, शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, तेजाभाई वाडेल, शिरोळे साहेब तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!