वाहतूक

मेट्रो स्थानकांवरून ग्रामीण उत्पादनांना मिळणार नवी ओळख

मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर कृषी उत्पादनांना मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई मेट्रो प्रभावी माध्यम ठरणार असून, यामुळे ग्रामीण उत्पादकांना मुंबईत हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकार), मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे तसेच वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई मेट्रो-३ ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आशियातील सर्वात लांब एकेरी भूमिगत मेट्रो म्हणून तिची ओळख आहे. मेट्रो स्थानकांवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ आता मुंबईसारख्या विशाल बाजारपेठेत सहज उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळेल, तर ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने सहजपणे उपलब्ध होतील. अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

वारणा स्टॉल हा केवळ व्यावसायिक उपक्रम नसून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. दुग्ध व्यवसायासोबतच शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी वारणा समूहाने केलेले कार्य देशासाठी आदर्शवत असल्याचे सांगत त्यांनी वारणा परिवाराचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, वारणा समूहाच्या माध्यमातून सुमारे दीड लाख शेतकरी उत्पादकांकडून दररोज दूध संकलित केले जाते आणि त्याचा मोबदला नियमितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला जातो. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुग्धजन्य पदार्थांना मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळावा, यासाठी मेट्रो स्थानकांवरील स्टॉल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

मुंबईतील ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देतानाच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!