मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत ‘तिसरी आघाडी’ची एन्ट्री; विक्रम गोखलेंच्या जमिनीवर प्रश्न

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत ‘तिसरी आघाडी’ मैदानात; विक्रम गोखलेंच्या जमिनीबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी’ने आठ उमेदवारांची घोषणा करत अधिकृतरीत्या निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. या आघाडीला अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्यानंतर आता शाहीर संभाजी भगत यांचा पाठिंबा मिळाल्याची घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी बोलताना तिसऱ्या आघाडीच्या प्रतिनिधींनी महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा अद्याप वापर न झाल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या जागेवर एका वर्षात गोरगरीब कलावंतांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन पूर्वी देण्यात आले होते; मात्र सहा वर्षे उलटूनही या प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

महामंडळाच्या सर्वसाधारण सभेतील निर्णय, चर्चा आणि प्रक्रिया सभासदांपर्यंत पोहोचत नसल्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला. या सभा थेट प्रक्षेपित का केल्या जात नाहीत, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
तिसऱ्या आघाडीने महामंडळात पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि सभासदकेंद्री कारभार आणण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या कार्यपद्धतीमुळे सभासदांचा विश्वास कमी झाल्याचा आरोप करत अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रलंबित प्रश्नांवरही चिंता व्यक्त करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान धमक्या, दबाव आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी तसेच प्रचार खर्चावर मर्यादा घालाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जवळपास ४५ हजार मतदारांचा लोकशाही हक्क डावलला जात असल्याचा आरोप करत, यामागे केवळ प्रशासनच नव्हे तर सर्व संबंधित संचालकही जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच, पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या मंडळाकडून कार्यकाळ वाढविण्याच्या प्रकारांमागे राजकीय खेळी असल्याचा आरोपही करण्यात आला.
तिसऱ्या आघाडीतील सर्व उमेदवार चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असून, सभासदांच्या समस्या सोडविणे आणि महामंडळात सकारात्मक बदल घडवून आणणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभासदांनी या आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.




