मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भ्रष्टाचाराचा आरोप; गाडगीळ यांची ऑडिटची मागणी

‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा : अनंत गाडगीळ
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प धोकादायक असल्याचा आरोप करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, डोंगराळ भागातील बोगद्यांमध्ये मजबुतीसाठी केले जाणारे काँक्रीट लायनिंग निकृष्ट दर्जाचे असल्यास पावसाळ्यात डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे ते निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. सोशल मीडियावर समोर आलेल्या छायाचित्रांवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
परदेशातील पायाभूत प्रकल्पांचा उल्लेख करताना गाडगीळ म्हणाले की, युरोपियन मानकांनुसार बोगदे किंवा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर किमान १० ते १२ महिने त्यांची चाचणी केली जाते. त्यानंतरच ते जनतेसाठी खुले केले जातात. मात्र, राज्यातील संबंधित प्रकल्पात घाईघाईत उद्घाटन करून सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या चाचण्या झाल्याचे दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुंबई–पुणे मार्गावर नियमित प्रवास करणारे टॅक्सीचालकही या मार्गाचा वापर करण्यास घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ९ ते १० किलोमीटरच्या प्रकल्पात नैसर्गिक उघड्या भागांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पावर सुमारे १२ ते १३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असून, या खर्चाचा तपशील सरकारने पारदर्शकपणे जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. जनतेच्या पैशाचा गैरवापर झाला असल्याचा संशय असल्याचेही त्यांनी म्हटले.
मिसिंग लिंकमधून प्रवास केल्यानंतर आपण या प्रकल्पाबाबत मंत्रालयातील काही पत्रकारांनाही चिंता व्यक्त केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. तसेच, “विकासाचे गुजरात मॉडेल नको,” असा टोलाही त्यांनी लगावला.





