फार्मर कपमुळे वाढला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास; शेतीत ऐतिहासिक परिवर्तनाचा विश्वास

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची जनचळवळ; ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २९ : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सध्या कार्यरत असलेले १८ हजार शेतकरी गट भविष्यात ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून एकत्र आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित फार्मर कप २०२६ च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातील शेतकरी झूमद्वारे सहभागी झाले.

यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी फार्मर कप अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फार्मर कपमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, तोच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल. मागील वर्षी या उपक्रमात सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका उत्पादनात सरासरी ७१ टक्क्यांनी वाढ झाली. सामूहिक खरेदीमुळे १,५८४ कोटी रुपयांची बचत, तर सामूहिक श्रमामुळे प्रति एकर सुमारे ६ हजार रुपयांची मजुरीची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.
महिला शेतकरी विधेयकाद्वारे शेतीच्या मालकीत नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत आहे. महाविस्तार ॲप आणि फार्मर कपमधील माहिती एकत्रित करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन केले जाईल. तसेच यंदा अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
फार्मर कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांच्या गावांना स्वतः भेट देणार असल्याचे सांगत, शासन, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
लोकसहभागातून शेती समृद्धीचा मार्ग : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, सामूहिक शेतीमुळे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढण्यास मदत होते. फार्मर कपमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून, महिला शेतकरी गटांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विकसित भारतासाठी सक्षम शेतकरी आवश्यक : आमिर खान
अभिनेते आमिर खान म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी सक्षम होणे अत्यावश्यक आहे. राज्यात फार्मर कपमुळे १८ हजारांहून अधिक शेतकरी गट तयार झाले असून, मार्गदर्शक (मेंटर्स) या उपक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष संवाद यांचा प्रभावी संगम या उपक्रमात साधला गेला असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास आणि एकजूट वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी गटांशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी गट, कृषी अधिकारी आणि मार्गदर्शकांशी संवाद साधला. महिला शेतकरी गट, विषमुक्त शेती, सामूहिक शेती, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी मांडले.





