रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नाग बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा संस्कारक्षम जिल्हा आहे. अशी बेघर निवारा केंद्रे उभी राहूच नयेत, यासाठी तुम्ही ब्रॉण्ड अॅम्बेसिडर बनून मुलांना जावून सांगण्याचा तसा प्रयत्न करा. ज्येष्ठांना मान सन्मान देण्यासाठी आपुलकीने विचारपूस करण्यासाठी या. बेघर निवारा केंद्राचे सहमंदिर नामकरण करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण आज झाले. या प्रसंगी मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, विपीन बांदरकर, राजेद्र शेटे, सुदेश मयेकर, राजेद्र महाडिक, बाबू म्हाप शीतलताई बावस्कर शिल्पाताई सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, बेघरांसाठी निवारा केंद्र असे मी म्हणणार नाही. सेहमंदिर म्हणू सगळ्यात चांगले शासनामार्फत घर देण्याचा जिल्ह्यातील हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही ज्या गादीवर झोपतो, जी चादर वापरतो, तशीच इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे. करमणुकीसाठी स्वतंत्र टीव्ही असला पाहिजे आणि वातानुकुलित घरात राहिले पाहिजेत. त्यासाठी जे काही पैसे लागतील ते दिले जातील. ज्या मुलांना जन्म दिला, ती मुले हे घर तुमच्यासाठी खुले नाही’ असे आपल्या ज्येष्ठांना सांगतात, हे अत्यंत वाईट आहे. हे मला इथे आल्यानंतर कळले आणि म्हणून मला असे वाटत की याचे सेहमंदिर असा नामकरण सोहळा देखील झाला पाहिजे.
घरातल्या माणसासारखं तुम्ही जर या लोकांना वागवाल, त्यावेळी त्यांचा शेवट हा आनंदामध्ये असू शकतो. इथ आलेल्या माणसाला वाटलं पाहिजे की माझ्या मुलाने काळजी घेतली नाही. माझ्या मुलीने काळजी घेतली नाही. पण नगरपालिकेने घेतली आणि त्यांच्यापेक्षा चांगली घेतली. अशा पद्धतीने या घरात सुविधा हव्यात. त्यासाठी माझ्या वडीलधान्या माणसाला जपण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देण्याची माझी प्रवृत्ती आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मातृत्व जपतात, त्यांनी अशा केंद्राच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनावे. उद्घाटनाला जशी आपण इमारत ठेवलेली आहे. तशीच 365 दिवस ती इमारत राहिली पाहिजे. आपण घरात जेवढी सेवा करणार नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट सेवा आपल्याला इथे करावी लागणार आहे. महाराष्ट्रात 87 ठिकाणी अशी केंद्र उभी राहत आहेत. त्या सर्वांचे सेहमंदिर नामकरण करण्याची मागणी मी करतो.
रत्नागिरीची संस्कृती जपण्याचे काम महिला भगिनींनी करावे. आपल्या परिसरामध्ये अशा गोष्टी जर घडत असतील तर त्याचे आत्मचिंतन सर्वांनीच केले पाहिजे. असा प्रकार घरामध्ये होता कामा नये. सेहमंदिरात माझे वडील आहेत. कोणीतरी माझा भाऊ आहे म्हणून चौकशी करायला भगिनींनी जावे अशा पद्धतीने विचारपूस करायला आपण आलो तर खऱ्या अर्थाने पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये असे सेहमंदिर उभे राहता कामा नये, याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे.
लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी पहाणी करून येथील ज्येष्ठांशी संवाद साधला. मुख्याधिकारी गारवे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावि केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.