मालवणमध्ये युती तुटल्याने उदय सामंतांची खंत; म्हणाले, ‘ आमदार नीलेश राणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न’

मुंबई ; मालवण येथे आयोजित शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रचार सभेत बोलताना उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात शिवसेना-भाजप युती (महायुती) न झाल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. या निवडणुकीत युती न होता आम्ही एकमेकांविरुद्ध लढत आहोत, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काही जण केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी शिवसेना उमेदवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही सामंत यांनी केला.
भाजपकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर राणेंनी माघार घेतली, पण युती झाली नाही याचं दुःख आहे, असं सामंत म्हणाले.
मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक
सामंत म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये युती झाली नाही याचे सर्वाधिक दुःख खासदार नारायण राणे यांना झाले आहे. त्यांची युती व्हावी अशी इच्छा होती. यावेळी त्यांनी थेट जातीय राजकारणावर बोट ठेवले. भाजपच्या एकाद्या मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्या व्यक्तीला तिकीट देऊन त्यांच्याकडून मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक केली जात आहे. याची नोंद मालवणवासियांनी घ्यायला हवी. निवडणुकीच्या लढाईत जात बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दोन जातींचा अपमान करण्यासारखे आहे आणि अशी घटना संपूर्ण महाराष्ट्रात पहिलीच घडली आहे, अशी टीका सामंत यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा निश्चित
मालवणमधील शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रचार कार्यालयात झालेल्या या जाहीर सभेत आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार ममता वराडकर, उमेश नेरुरकर, महेश कांदळगावकर, संजय पडते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते. मालवणमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये येणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.




