महाराष्ट्र

अन्यायाविरुद्धचा लढा सहकारातून समृद्धीकडे वळवा” – रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

एका कार्यकर्त्याने किमान 50 कार्यकर्ते जोडावेत; रिपब्लिकन पक्षाच्या विस्तारासाठी संघटनबळ वाढवा

सिल्वासा / मुंबई, दि. 17 :- रिपब्लिकन पक्षाचा वारसा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित असून हा पक्ष सर्व जाती-धर्मीयांचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

सिल्वासा येथील फोर स्टोन रिसॉर्टमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले पाहिजेत.”

“ज्यांना भारतीय संविधान मान्य नाही त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले की, चळवळीत अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना आता केवळ संघर्षापुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांनी सहकार क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात उतरावे. “अन्यायाविरुद्ध लढा अधिक तीव्र ठेवतानाच सहकार चळवळीतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग स्वीकारावा,” असे त्यांनी सांगितले.

फोर स्टोन रिसॉर्टच्या वातावरणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, “आम्ही चळवळीत अन्यायाविरुद्ध दगड उचलले, आता त्या दगडांच्या ताकदीला सहकार आणि विकासाच्या दिशेने वळवण्याची गरज आहे.”

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि विविध राज्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, विविध राज्य व प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या नेत्या यांचीही उपस्थिती होती.

या प्रशिक्षण शिबिरात संघटनबळ वाढवणे, सहकारी संस्था उभारणे आणि कार्यकर्त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सहकार क्षेत्रात प्रवेश करावा, यावर भर देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!