मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना ३.४० कोटींची आर्थिक मदत
मुंबई, दि. ५ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये मृत्यू झालेल्या ३४ व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना राज्य सरकारने आर्थिक मदत मंजूर केली आहे. प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान एकूण ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण २७ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली होती. मात्र, त्यापैकी ३४ वारसदारांना मदत मिळणे अद्याप प्रलंबित होते.

अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उर्वरित वारसदारांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले होते.
गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यवाहीमुळे या ३४ वारसदारांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. लाभार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील १५, धाराशिवमधील ५, परभणीतील ४, हिंगोलीतील ४, नांदेडमधील ३, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका वारसदाराचा समावेश आहे.
आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यानुसार संबंधित विषयांवर वेगाने कार्यवाही सुरू असल्याची माहिती डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.





