कोल्हापूरच्या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकामाला गती देण्याचे आदेश
कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बांधकाम ३० जुलैपर्यंत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. २ : विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम ३० जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकाम प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अमल महाडीक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, कामाची प्रगती आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे आहे.
बांधकामाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करून कामाची गती वाढवावी. प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत आवश्यक समन्वय साधावा आणि ३० जुलैपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
स्थानिक पातळीवर कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्यांचे तातडीने निराकरण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण, आधुनिक प्रयोगशाळा, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि सक्षम पायाभूत व्यवस्था उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असून, त्यादृष्टीने या प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.






