महाराष्ट्रकोंकण

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ‘नातेवाईकांसाठी विश्रामगृह’ सेवा सुरू; लोकार्पण सोहळा !

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या “नातेवाईकांसाठी विश्रामगृह” या सुविधेचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता आपण जाणतो. उपचार घेत असलेल्या रुग्णांची काळजी घेताना नातेवाईक अनेक अडचणींना सामोरे जातात. यात राहण्याची गैरसोय ही सर्वात महत्त्वाची. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठची विश्रामगृह रत्नागिरी येथे उभारण्यात आले, ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी उदय सामंत ह्यांनी म्हटले. हे विश्रामगृह केवळ निवासासाठी नाही, तर नातेवाईकांना मानसिक आधार देणारे, एक धीर देणारे ठिकाण ठरेल. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला “आपुलकीचा आणि सुरक्षित आधार” मिळेल, असा विश्वास उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.

विश्रामगृहात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन, बसण्याच्या व झोपण्याच्या सोयी- सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नातेवाईकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरात परगावाहून आले असताना मोठा दिलासा मिळेल, असे देखील उदय सामंत ह्यांनी म्हटले. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी, वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, विभागप्रमुख सचिन सावंत यांसह अन्य पदाधिकारी व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!