महाराष्ट्रमुंबई

विधान परिषद उमेदवारीवरून शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे नाराज?

मुंबई प्रतिनिधी : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीची घोषणा होताच, पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या नाराजीचे सूर सोशल मीडियावर उमटले. त्यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट करत मनातील खदखद व्यक्त केली, जी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

“मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।
जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला, वो किसी स्वप्न देखी चाह से कम भी नहीं…”

शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज (सोमवार) संपली. महायुतीकडून पाचही उमेदवार जाहीर झाले असून, विरोधकांनी एकही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण केली आहे.

शिवसेना (शिंदे गट) ला पाच पैकी फक्त एक जागा मिळाली असून, त्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी धुळ्याचे चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली. यामुळे पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची निराशा झाली आहे. या जागेसाठी त्यांच्यासह ओबीसी नेते किरण पांडव आणि संजय मोरे यांची नावेही चर्चेत होती. मात्र, ऐन शेवटच्या दिवशी शिंदे गटाने रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने म्हात्रे समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी?
शीतल म्हात्रे यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांच्या शायरीतून “ज्याची अपेक्षा होती, ते मिळाले नाही” असे सूचित होते. मात्र, “जे मिळाले आहे तेही कमी नाही,” असे म्हणत त्यांनी संयम ठेवण्याचा संदेशही दिला आहे.

राजकीय भविष्य काय?
शीतल म्हात्रे या शिवसेना (शिंदे गट) च्या आक्रमक प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नावावर विधान परिषदेसाठी पक्षात गंभीर विचार सुरू होता, मात्र शेवटी त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

यापुढे पक्षात त्यांना कोणती भूमिका दिली जाते आणि त्यांच्या या अप्रत्यक्ष नाराजीला शिंदे गट कोणत्या पद्धतीने हाताळतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!