एटीएममधून पैसे काढणं आजपासून महागलं,वाचा नवा बदल

मुंबई-नवीन वर्षाच्या सुरूवातीला रिझर्व बँकेने काही गोष्टीत बदल केले आहेत.त्यातला महत्वाचा बदल म्हणजे रिझर्व बँकेच्या नव्या नियमांनुसार आता एटीएमधून विनाशुल्क पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. ग्राहकांनी जर आता ATM व्यवहाराची मर्यादा ओलांडली तर त्यांना १ जानेवारी २०२२ पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जून २०२१ च्या आदेशाप्रमाणे, १ जानेवारी २०२२ पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार २१ रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. या नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणं आता महागणार आहे.
दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येणार आहेत. पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा विनामूल्य व्यवहार करू शकता. इतर एटीएमधून तीनपेक्षा जास्त वेळ पैसे काढले तर त्यांनी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.