आळंदीतील पूरस्थिती गंभीर; वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आळंदी व देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यातूनच वारीत सहभागी व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६: इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात जाणे सुरक्षित नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी आणि भाविकांना आळंदी व देहू येथे जाण्याऐवजी पुणे शहरातूनच वारीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या वारकरी व भाविकांनी ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबावे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे टाळावे.

प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच पुणे शहरापर्यंत पोहोचलेल्या वारकरी बांधवांनी पुण्यातच थांबून तेथूनच वारीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!