न्यायालयाच्या आदेशानंतर मालवणीत मोठी कारवाई; १४०० चौ. मीटर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
न्यायालयाच्या आदेशानंतर मालवणीत प्रशासनाची कारवाई; शासकीय जमिनीवरील १४०० चौ. मीटर अतिक्रमण हटवून जागा मुक्त
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (जनहित याचिका क्र. ६/२०१३) तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या (विशेष अनुमती याचिका क्र. २९०४८/२०१८) निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम येथील मौजे मालवणी, बोरीवली तालुक्यातील स.नं. १४०, न.भू.क्र. २६७० येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आज मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी तलाव बुजवून उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाने कारवाई करत सुमारे १४०० चौ. मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. ही मोहीम मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार आणि अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगर श्री. गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढगे, प्रभारी उपजिल्हाधिकारी श्री. विनायक पाडवी, तहसीलदार श्री. इरेश चप्पलवार, महापालिका पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती नीता पाडवी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेंद्र नगरकर यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
शासकीय जमिनीवरील वाढते अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि नियोजनबद्ध शहरी विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी शासकीय जागांवर अतिक्रमण करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर आणि तलाव क्षेत्राच्या विद्रुपीकरणावर अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





