महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त मंत्री बावनकुळे यांनी मांडले चौफेर वाटचालीचे ‘प्रगती पुस्तक’..
शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योगांना बळ; राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेने नेले असल्याचे प्रतिपादन.....

मुंबई: विकसित महाराष्ट्राचा मजबूत पाया रचला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने वर्षभरात राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेने नेले आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योगांना बळ देत राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारला आज (५ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्याची स्थिरता, विकासाचा वेग आणि परिणामकारक प्रशासनाचा एक मजबूत प्रवास साधला गेला आहे. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे मापदंड स्थापित केले असून, कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांत क्रांतिकारक निर्णय घेत सरकारने पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा आदर्श निर्माण केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
राज्यातील महायुती सरकारला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सर्वंकष आढावा घेणारे ‘रिपोर्ट कार्ड’ जनतेसमोर मांडले. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे, मुंबई भाजपाचे सोशल मीडिया संयोजक प्रतीक करपे आदी उपस्थित होते.
प्रमुख कामगिरीचा आढावा
शेतकरी आणि सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य
राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. तसेच, पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि पीकविमा भरपाईत गती आणली आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा देऊन या क्षेत्राला बळकटी दिली आहे. सिंचन क्षमता वाढवण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच, ‘जलयुक्त शिवार २.०’ अंतर्गत वर्षभरात ३७ हजारांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत.
महसूल विभाग गतिमान आणि कठोर निर्णय
शेतकरी व शेतीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत महसूल विभागाने अनेक गतिमान व कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठीचे शुल्क माफ, तुकडेबंदी रद्द करण्याचा निर्णय, गरिबांना घरकुलासाठी मोफत वाळू, डिजिटल सातबारा, आणि ऑनलाईन सातबारा आदी निर्णयांचा समावेश आहे. गरिबांसाठी घरे, मालमत्ता रक्षण, पर्यावरण संरक्षण, विद्यार्थी हित, विस्थापितांना आधार, शासकीय कामात प्रोत्साहनासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पदोन्नती, तसेच गतिमान व पारदर्शी प्रशासनासाठी दक्षता पथक व समितीसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचा उच्चांक
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख उंचावला असून, दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील ८० टक्के करारांची अंमलबजावणी सुरू आहे. २०२४-२५ या वर्षात राज्यात १ लाख ६४ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक (FDI) आली असून, ती गेल्या वर्षीपेक्षा ३४ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, दीड लाख सरकारी नोकऱ्या आणि ४५ हजार पोलीस भरती प्रक्रियेद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांचे जाळे आणि स्वस्त वीज
समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करणे, शक्तीपीठ महामार्ग व वाढवण बंदर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे नियोजन आणि मुंबई मेट्रोचा विस्तार यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीजदरात कपात करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव महावितरणने आयोगाकडे सादर केला असून, आगामी पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार आहेत.
महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारसा
‘लाडकी बहीण’ योजना राज्यात यशस्वीपणे राबवली जात आहे. तसेच, महिला बचत गटांसाठी १० जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारले जात आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक आग्र्यात आणि पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारून सरकारने राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले आहे.
डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन
सरकारी सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणे, आपत्ती व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण आणि ऑनलाइन प्रशासनावर भर देत सरकारने ‘लोकाभिमुख’ कारभार केला आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी नमूद केले.






